अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त शि.बा. कोडगिरे यांची माहिती
औरंगाबाद | जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद यांनी दिनांक 5 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशानुसार 5 मार्च ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत ‘मिशन ब्रेक द चैन’ नुसार अन्न आस्थापनाबाबत उपाययोजनांची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. त्यात उपहारगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यगृह पूर्णत: बंद राहतील. मात्र पार्सल सेवा सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु राहील. खाद्य पदार्थ विक्रेत्यांना केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरु ठेवता येईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त शि.बा. कोडगिरे यांनी कळविले आहे.अन्न पदार्थाची होम डिलिव्हरी सेवा नियमितपणे सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत या वेळेत सुरु राहील. होम डिलीव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण किंवा RTPCR चाचणी निगेटीव्ह झालेले असणे आवश्यक आहे.अटी शर्तीसह हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यगृह किराणा दुकाने सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत पार्सल सुरु ठेवता येतील. होम डिलीव्हरी (Take away) व त्यासाठी स्वयंपाकगृह (kitchen) रात्री 8 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा असेल. सर्व औषध विक्रेत्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून रात्री 8 नंतर व्यवसाय चालू ठेवण्याची मुभा दिली आहे. तथापी त्यांनी रात्री 8 वाजेच्या नंतर केवळ औषध विक्री करावी. रात्री 8 वाजेच्या नंतरच्या कालावधीत त्यांनी आईस्कीम, थंडपेये इत्यादी कोणत्याही अन्न पदार्थाची विक्री करु नये.ज्या आस्थापनांना या कालावधीत 5 मार्च 2021 ते 30 एप्रिल 2021 व्यवसाय सुरु राहण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्या आस्थापनांशी संबंधीत सर्व मालक, चालक, कर्मचारी, मजूर व तेथील कार्यरत सर्व व्यक्तींना कोविड-19 च्या अनुषंगाने दर 15 दिवसांनी RTPCR वारंवार तपासणी करणे बंधनकारक राहील. नजीकचा (Latest) तपासणी अहवाल जवळ बाळगणे अनिवार्य असेल. तसेच कोविड-19 च्या अनुषंगाने मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल.




