
आठव्यांदा आशिया कपच्या ट्रॉफीवर कोरले भारताचे नाव
भारताने लंका जिंकली
आज टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात आशिया कपचा अंतिम सामना कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा दहा गडी राखून पराभव करत भारताने आठव्यांदा आशिया कपच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय. या सामन्यात श्रीलंकेचा एकही फलंदाज मोहम्मद सिराजच्या झंजावातापुढे टिकू शकला नाही. परिणामी श्रीलंकेचा संपूर्ण संघ केवळ 50 धावांत तंबूत परतला.
तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ 15.2 षटकांत केवळ 50 धावांवरच मर्यादित राहिला. टीम इंडियाच्या वतीने मोहम्मद सिराजने प्राणघातक गोलंदाजी करत सहा गडी बाद केले.
श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक 17 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने एकही विकेट न गमावता अवघ्या 6.1 षटकांत हे लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक 27 धावा केल्या.