
महावितरणकडून शनिवारी (ता. २६) शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारपासून सलग तीन दिवस अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती भाग व उपनगरातील पाणीपुरवठा एक दिवस विलंबाने होणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. महावितरण प्रशासनाकडून वृक्षांच्या फांद्या तोडणे, विद्युत यंत्र सामुग्रीची देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी शनिवारी (ता. २६) सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत शटडाऊन घेण्यात येणार आहे.
दुरुस्ती कामे करण्यात येणार
या कालावधीत महापालिकेकडून शहर पाणी योजनेवरील दुरुस्ती कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे अहिल्यानगर शहारातील मध्यवर्ती भाग व उपनगरातील ज्या भागात शनिवारी (ता. २६) पाणी पुरवठा होणार आहे तेथे रविवारी (ता. २७), रविवारी (ता. २७) पाणी पुरवठा होणाऱ्या भागाला सोमवारी (ता. २८) व सोमवारी (ता. २८) पाणी पुरवठा होणाऱ्या भागाला मंगळवारी (ता. २९) पाणी पुरवठा होईल.