
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर आताराज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. डिसेंबर महिन्याच्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी जोमाने तयारी करत असून महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष या निवडणुकीत एकत्र लढणार की स्वबळावर लढणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोठी घोषणा केली आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबई वगळता सर्व ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पक्ष वाढवायचा म्हटल्यावर निवडणुकांत अनेकांना संधी द्यावी लागते. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येच खऱ्या अर्थाने पक्षवाढ होत असते. त्यामुळे मुंबई वगळता आमचा पक्षाने उर्वरित महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फक्त मुंबईत महायुती म्हणून एकत्र लढण्यावर विचार करत आहोत. मात्र उर्वरीत राज्यात स्वतंत्र निवडणुकीला आम्ही पुढे जावू. त्यामुळे पक्ष वाढीस मदत होते, स्थानिक स्तरावर स्थानिक नेत्यांना युती करायची असेल तर तो त्यांचा अधिकार असेल. आम्ही त्यात बोलणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय स्तरावर मेघालय, मणिपूर, बिहारमध्ये निवडणुका लढणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
मुंबईबाहेर उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक नेत्यांना युती करायची असेल तर ते नक्कीच करू शकतात पण आम्ही पक्ष स्तरावरून महायुती म्हणूनच लढा, असे आदेश देणार नाही, असे प्रफुल पटेल म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या सरकारमध्ये आहे. तिन्ही पक्षांच्या उत्तम समन्वयाने सरकार व्यवस्थित काम करते आहे. राष्ट्रवादीचे आठ मंत्री सरकारमध्ये आहेत. पण संबंधित मंत्र्यांचे हवे तेवढे लक्ष पक्षसंघटनेकडे नाही, अशी तक्रार खुद्द पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी बोलून दाखवली. नागपुरात सुरू असलेल्या शिबिरात मंत्र्यांना पक्षसंटनेकडे लक्ष द्यावेच लागेल, असेच प्रफुल पटेल यांनी एकाअर्थी सुचवले आहे.