नवी दिल्ली – हाथरसमधील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपास हाती घेतल्यानंतर सीबीआयनं प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपासासाठी समितीही नियुक्त केली आहे. हाथरसमध्ये झालेल्या या घटनेननंतर देशात संतापाची लाट उसळी होती. या घटनेचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी होत होती. त्यामुळे योगी सरकारनं सीबीआय चौकशीची शिफारस केली होती.
दरम्यान, उत्तरप्रदेशातील हाथरस प्रकरणाचे पडसाद देशात उमटले. त्या प्रकरणाचा आणि प्रकरणाच्या हाताळणीवरून उत्तरप्रदेश सरकारचा निषेध केला गेला. या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून घेण्यास केलेला उशीर, पीडित तरुणीच्या कुटुंबावर टाकण्यात आलेला दबाव, कुटुंबाला भेटण्यापासून मीडियाला रोखणे, अशा अनेक प्रकारांमुळे उत्तर प्रदेश पोलिसांच्या भूमिकेकडे बोट केले जात होते.
हाथरस प्रकरणाला आणखी एक ट्विस्ट?
केंद्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याने प्रकरण आणखी तापले होते. देशभरातून टीका झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार आज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.