शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा हेतू! पंतप्रधान मोदींचे वक्तव्य!
नवीदिल्ली : प्रस्तावित कायद्यांमुळे देशातल्या कोटय़वधी शेतकऱ्यांचे सक्षमीकरण साधले जाणार असून कृषी क्षेत्राचा पूर्णत: कायापालट होणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा आणि त्यांची भरभराट साधण्याचा हेतू साध्य करण्यास मदत होणार आहे, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, ‘देशातल्या कृषी क्षेत्राला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अत्यंत गरज आहे. यातून उद्यमी शेतकऱ्यांना मदत होणार आहे. उत्पादनवाढीसाठी असे तंत्रज्ञान मिळविण्यास या कायद्यांची मदत होणार आहे. हे निश्चितच स्वागतार्ह आहे.
कृषी क्षेत्राबाबतची दोन विधेयके रविवारी मंजूर झाल्यानंतर, हा भारतीय कृषी क्षेत्रासाठी ऐतिहासिक निर्णय आहे. या प्रस्तावित कायद्यांमुळे शेतकऱ्यांची अनेक अडचणींतून सुटका होणार आहे. शेतकऱ्यांवर अनेक दशके असलेल्या निर्बंधांमुळे त्यांची मध्यस्थांकडून लूट झाली आहे.
शेतकऱ्यांसाठी सध्या सुरू असलेली शासकीय हमीभावाची योजना यानंतरही अस्तित्वात राहील. आम्ही याआधी सांगितले आहे, आणि पुन्हा सांगत आहोत की, किमान हमीदराची पद्धत कायम राहणार आहे. त्या दराने सरकारकडून होणारी खरेदी सुरूच राहील’.