रूग्णवाहिका सेवा पुरवणाऱ्यांचे तेजस्विनीने मानले आभार

मुंबई : कोरोना काळात सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची जाणीव ठेवत अविरत जनसेवा करणाऱ्या कोरोनायोद्ध्यांना यंदाच्या नवरात्रीमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित आदरांजली वाहत आहे. डॉक्टर, पोलिस, सफाई कर्मचारी, शेतकरी आणि प्राणीमित्रांना पहिले पाच दिवस आदरांजली अर्पित केल्यावर नवरात्रीच्या सहाव्या दिवशी तेजस्विनीने रूग्णवाहिका सेवा पुरवणा-यांचे आभार मानले आहेत.

रूग्णाचे प्राण वाचवण्यासाठी इच्छितस्थळी देवासारखे धावून येऊन डॉक्टरांपर्यंत पोहोचवणा-या रूग्णवाहिका अत्यंत मोलाची कामगिरी बजावतात. कोरोना काळात तर ‘सोशल डिस्टसिंग’च्या कारणास्तव माणूस माणसापासून दूर गेला असताना, रूग्णवाहिकांनी कोरोनारूग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवायची जबाबदारी अतिशय दक्षपणे आणि अहोरात्र चालवली. त्यामुळे तेजस्विनी पंडितने षष्ठीला ह्या ‘दैवी’ कर्म करण्याची प्रेरणा घेऊन काम केलेल्या रूग्णवाहिका चालकांचे आभार मानले आहेत.

तेजस्विनी पंडित म्हणते, “कोरोना झाल्यावर रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रेन अशा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करू शकत नाही. तुम्हांला बरं नसताना, तुमचे आपले नातेवाईकही तुम्हांला हात धरून हॉस्पिटलपर्यंत पोहोचवू शकत नाही. अशावेळी एकाकी पडलेल्या रूग्णांना खरा मदतीचा हात दिला तो ह्या रूग्णवाहिका चालकांनी. आपला जीव धोक्यात घालून हजारो रूग्णांना त्यांनी जीवनदान मिळवण्यासाठी प्रयत्न केले. “

तेजस्विनी पुढे म्हणते, “आज आपण कोरोनायोद्ध्यांमध्ये पोलिस, डॉक्टरांची नाव आवर्जून घेतो. पण रूग्णवाहिका चालकांच्या या खारीच्या वाट्याला मात्र आपण विसरलो आहोत. जसा खारींनी प्रभु रामचंद्रांना सेतू बांधायला मदत केल्यामुळेच तर असत्यावर सत्याचा विजय झाला. तसंच कोरोनारूपी रावणाला हरवायला, रूग्णवाहिकांनी उचललेला वाटा खूप महत्वाचा आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here