पालकमंत्री हरवले; मुश्रीफ म्हणाले, मी गुरुवारी येतोय!
अहमदनगर: ‘गेल्या सहा महिन्यापासून प्रशासनाने चांगले काम केले आहे. तुम्ही खूप कष्ट घेतले, त्याबद्दल तुमचे आभार. आता मी गुरुवारी येतोय, तेव्हा सविस्तर आढावा घेऊ,’ असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. मुश्रीफ यांनी आज नगर जिल्ह्याचा ऑनलाइन आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
मुंबईत स्वप्नातलं घर पाहताय? हीच आहे योग्य वेळ
नगरमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मात्र १५ ऑगस्टनंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले नाहीत. त्यावरून त्यांच्यावर भाजप नेत्यांसह मनसेकडून ही टीका होऊ लागली आहे. माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही नगरमध्ये बोलताना पालकमंत्र्यांवर टीका केली होती. ‘सरकारमध्ये काम करणारे सत्ताधारी पक्षातील लोकांचा पब्लिसिटी इव्हेंट चालू आहे. त्यांना जनतेची काळजी नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना तर नेमकी कशाची काळजीय? त्यांचा तर सगळा वेळ ग्रामपंचायतवर मागच्या दाराने प्रशासक म्हणून आपले बगलबच्चे नेमण्याच्या प्रयत्नात गेलाय,’ अशी टीका विखे यांनी पालकमंत्र्यांवर केली होती. तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हरवले आहेत, त्यांना शोधून द्या, अशा आशयाचे पत्रच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले होते. या पार्श्वभूमीवर आता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज नगर जिल्ह्याचा करोनाचा अनुषंगाने ऑनलाइन आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी त्यांना जिल्ह्याची माहिती दिली.
यावेळी मुश्रीफ यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले. नगर जिल्ह्याचा करोना या आजारातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. त्याबद्दल मुश्रीफ यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच सहा महिन्यापासून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जे कष्ट घेतले, त्याबद्दल त्यांचे आभार मानले. गुरुवारी मी येतोय, कलेक्टर साहेब मी आपल्या ऑफिसमध्ये येतोय , त्यावेळेस आपण सविस्तर आढावा घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.