टिकवा जमिनीची सुपीकता

1028

टिकवा जमिनीची सुपीकता

जमिनीमधील उपलब्ध असलेल्या गरजेच्या सर्व अन्नद्रव्यांचा पिकांना पुरविण्याच्या क्षमतेला जमिनीची सुपीकता म्हणतात. माती परिक्षणाव्दारे जमिनीची सुपीकता ओळखली जाते.

संतुलित पोषण महत्त्वाचे :-

1) सेंद्रिय आणि असेंद्रिय निविष्ठांचा वापर जैविक खतांसोबत करून पीक उत्पादनामध्ये निश्‍चितपणे वाढ होते, उत्पादनाची प्रतही सुधारते. हळूहळू जमिनीची सुपीकता वाढते आणि रासायनिक खतांवरील निर्भरता काही प्रमाणात कमी होते.

2) शेतावरच उपलब्ध काडीकचरा, कुटार इत्यादी घटकांचा वापर केल्याने एकूण खतांवरील खर्चात बचत करता येते.

3) सेंद्रिय खते वापरल्यामुळे दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकास मिळून पिकांचे संतुलित पोषण होते आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढते. एक टन शेणखत जमिनीत मिसळल्यास सहा ते सात किलो नत्र, तीन ते चार किलो स्फुरद व सात-आठ किलो पालाश जमिनीला मिळतो. या सोबतच एक किलो गंधक, 250 ग्रॅम मँगेनिज, 100 ग्रॅम जस्त, 75 ग्रॅम लोह, 25 ग्रॅम बोरॉन आणि दोन ग्रॅम मॉलिब्डेनम इतकी अन्नद्रव्ये जमिनीला मिळतात.

4) शेणखताचा नियमित वापर केल्यास सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जमिनीत जाणवत नाहीत. याशिवाय मोठ्या प्रमाणात जमिनीला सेंद्रिय पदार्थ मिळतो आणि जमीन आरोग्य सुधारते. दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळाल्यामुळे इतर मुख्य अन्नद्रव्यांच्या पिकावाटे होणाऱ्या शोषणास मदत होते आणि पर्यायाने अतिशय महाग असलेल्या रासायनिक खतांचा प्रभावी आणि कार्यक्षम वापर होण्यास मदत होते.

5) सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो त्यामुळे जमिनीतील संरचना सुधारते, पाणी आणि अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता वाढते, निचरा चांगला होतो, धूप कमी होते आणि जमिनीचे आरोग्य सुधारते. गरजेनुसार संतुलित पुरवठा झाल्यामुळे अन्नद्रव्यांचा प्रभावी वापर होतो आणि जमिनीच्या आणि पाण्याच्या प्रदूषणाचा धोका टळतो. अन्नद्रव्यांचे निरनिराळे स्रोत वापरले जाऊन त्यांचा शेतीमध्ये योग्य वापर केला जातो. अन्नद्रव्यांची निसर्गातील साखळी सुस्थितीत ठेवण्यास मदत होते आणि पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here