जन आधार सामाजिक संघटनेने नगर-जामखेड रोडवरील निकृष्ट पॅचिंगचे काम पाडले बंद

निकृष्ट कामाच्या निषेधार्थ रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-जामखेड रोड येथे राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत जामखेड नाका ते आठवड या 19 किलोमीटर रस्त्याचे पॅचींगचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करीत काम बंद पाडून जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात गणेश निमसे, अमित गांधी, वजीर सय्यद, शरद बेरड, गौरव बोरकर, मच्छिंद्र गांगर्डे, हनुमंत कल्हापुरे आदी सहभागी झाले होते.

मागील महिन्यात जामखेड नाका ते आठवड या रस्त्यावर 19 किलोमीटर पर्यंत रस्ता पॅचिंगच्या कामाचे उद्घाटन होऊन सदर काम हाती घेण्यात आले आहे. खड्डे बुजवण्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून, खड्डे फक्त खडी टाकून बुजवले जात आहे.

त्या खड्ड्यांमध्ये डांबर सुद्धा वापरले जात नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. खड्डे बुजविण्याचे काम योग्य पध्दतीने न झाल्यास रस्त्यावर टाकण्यात येणारी लेयर देखील जास्त काळ टिकणार नाही.

रस्त्यासाठी सुमारे 15 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. एवढा खर्च करुन देखील रस्ता चांगला न झाल्यास पुढील वर्षी हीच समस्या उद्भवणार आहे. अशा निकृष्ट कामामुळे जनतेच्या पैश्याची एकप्रकारे उधळपट्टी चालू असल्याचे पोटे यांनी म्हंटले आहे.

काम चांगले होण्यासाठी दखल न घेतल्यास नॅशनल हायवेच्या अभियंत्यास खुर्चीला बांधून निकृष्ट काम होऊ देणार नसल्याचे संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here