
कॉन्ट्रॅक्ट, टेंडरच्या मागे लागू नका, मतदारसंघाच्या व्यापक हिताचा विचार करून कामे करा. आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा आहे, त्यानुसार पुढे जा असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना दिला आहे. फडणवीस यांनी भाजप आमदारांना बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन दिले. यावेळी त्यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. विकासाची कामे करताना मतदारसंघाचे कशात भले आहे, त्याचा विचार करूनच कामे केली पाहिजेत. आमदार निधीचा योग्य वापर करा. राज्यासमोर आर्थिक अडचणी काही महिने नक्कीच आहेत पण त्याचा फटका विकासकामांना बसणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.