नगर पुणे रोडवर अपघात होऊन गेलेत अनेकांचे बळी! जिल्हा वाहतूक शाखेचे सह पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखा का करत आहेत दुर्लक्ष! 0 Friday, August 13, 2021 शिरूर ( प्रतिनिधी ) – मराठवाडा व विदर्भात जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लांब पल्ल्याचा प्रवास असल्याने खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी प्रवासी मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात एजन्सी दिले आहेत त्यांचे कार्यालय नगर पुणे रोड वरच रस्त्याच्या कडेला असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. एजन्सीच्या बाहेर प्रवाशांची वाढलेली गर्दी व उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स मुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्यांना भोगावा लागतो आहे.
नगर पुणे रोडवर मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र आहे. अनेक बड्या इंटरनॅशनल नॅशनल कंपन्या आहेत. कंपन्यांमध्ये काम करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या वसाहती आहेत. औद्योगिक कंपन्यांमध्ये मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातून बहुसंख्येने कामगार वर्ग येथे येत आहे.
वाघोली, सणसवाडी, भीमा कोरेगाव,शिक्रापूर, रांजणगाव गणपती,कारेगाव या ठिकाणी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एजन्सी दिलेल्या आहेत. या एजन्सीचे कार्यालय रोडवरचा असल्याने तेथे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळते. त्यामुळे ट्रॅव्हल्स रस्त्यावरच उभी करताना पहावयास दिसते.
कंपन्यां मध्ये काम करणाऱ्या कामगार वर्गाची सुटण्याची वेळ सायंकाळची असल्याने त्यांना मोठे कसरतीने मार्ग काढत आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या वाहतूक कोंडीमुळे अनेक अपघात झाले असून त्यात अनेकांचा बळी गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दखल घेऊन ट्रॅव्हल्स चालकांच्या सुरू असलेल्या मुजोर गिरीला आळा घालून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.





