ग्रामसेवकांची पदे प्राधान्याने भरण्याची ग्वाही
मुंबई- दि.2 – शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी ग्राम कृषी संजीवनी समिती महत्वाची असून या समित्या तातडीने गठित कराव्यात, विशेषत: अकोला, अमरावती, बुलडाणा, जालना जळगाव जिल्ह्यातील समित्या गठित करण्याची प्रक्रिया तातडीने गतीमान करावी, ग्रामसेवकांनी या समितीच्या कामकाजात सदस्य सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारून कामकाज सुरू करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच ग्रामसेवकांची रिक्त पदे प्राधान्याने भरण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करून अंमलबजावणी करण्याबाबत मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ते बोलत होते.