
ईव्हीएम हॅक होतं की नाही? हा वाद प्रत्येक निवडणुकीत चर्चेत असतो. धुळे सोलापूर मार्गावर EVM च्या विरोधात रस्त्यावर उतरून जाळपोळ करण्यात आली. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएम वर बंदी घालण्याची मागणी करत राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात काहीजण घुसले होते. एकूणच ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच शेजारील राज्यात EVM ऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कर्नाटकात EVM च्या या वादावर फुलस्टॉप लावण्यात आलाय. मुंबई महापालिकेपेक्षा मोठ्या असणाऱ्या बंगळुरु महापालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेतल्या जाणार आहेत.
कर्नाटक राज्यात मे २०२६ मध्ये होणाऱया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात येणार आहेत. तेथी राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. बेंगळुरु प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच महानगरपालिकांच्या निवडणुका २५ मे नंतर होणार आहेत. त्यामध्ये मतदानासाठी मतपेट्या आणि बॅलेटपेपर ही ही जुनी पद्धत वापरण्यात येणार आहे, असे बंगळुरुचे मुख्य निवडणूक अधिकारी जी. एस. संगरेशी यांनी सांगतिले. एवढेच नाही तर या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकाही बॅलेट पेपरवर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील कोणताही आक्षेप घेतलेला नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयांमध्ये सरकार हस्तक्षेप करणार नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी दिली आहे. तर भाजपने या निर्णयावरुन काँग्रेसवर टीका केली आहे. स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळापासून ईव्हीएमने निवडणूक घेण्याची प्रथा सुरु झाली. मात्र, आता काँग्रेसकडून खासदार राहुल गांधी यांना खूष करण्यासाठी बॅलेट पेपरटचा निणर्य घेण्यात आला, अशी टीका भाजपने केली.





