दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता लागू होईल, भाजपाच्या बड्या नेत्याचा दावा; कार्यकर्त्यांना म्हणाले…

    31

    पुणे : महाराष्ट्रात आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आता चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर तंत्र व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल, त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागू, असे त्यांनी म्हटले आहे.

    चंद्रकांत पाटील म्हणाले, लोकसभा, विधान सभेपेक्षा नेत्याची खरी निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका असते. लोकशाहीमधील सर्वात महत्त्वाची ही निवडणूक आहे. कदाचित आज (4 ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होईल. आता कुणीतरी म्हणतील निवडणूक आयोगाशी दादांची चर्चा झाली वाटते. मी 40 वर्षे यामध्ये घालवली त्यामुळे मी अंदाज मांडला आहे. दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल, त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागू या, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

    पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 2019 साली ज्यांचे तिकीट नाकारले त्या बावनकुळे यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवण्याचे अधिकार मिळाले. निवडणूक ही फास्ट ट्रेन प्रमाणे आहे, प्लॅटफॉर्मवर जो राहील तो राहील. मात्र, नाराज होऊ नका. राजकारणात प्रयत्नाबरोबरच नशीब देखील लागते. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा फरक असला पाहिजे. 2017 ची परिस्थिती बदला, त्यासाठी येणाऱ्या दिवाळीचा फायदा करून घ्या. लोकांना भेटून संपर्क वाढवा, असा कानमंत्र पाटील यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

    चंद्रकांत पाटील म्हणाले, निवडणूक महायुती म्हणून लढवायची आहे मात्र शेवटच्या क्षणी कोणता निर्णय घ्यायचा हे वरिष्ठ नेते ठरवतील. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना मागत असलेल्या ठिकाणी आपला चांगला उमेदवार असेल तर मैत्रीत लढू, पण कार्यकर्त्यांचा बळी दिला जाईल असे लढणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

    उद्धव ठाकरे यांनी 2019 साली थोडा समजूतदारपणा दाखवला असता तर हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शोधावे लागले असते, पण ते आडून बसले नसते तर राज्यात चित्र वेगळे दिसले असते. नियती ही नियती असते. 2019 साली सरकार जाणे हा नियतीचा खेळ आहे. 2019 साली उद्धव ठाकरे यांनी हे सगळे करून काय मिळवले? मी कधीच कोणतं तिकीट मागितलं नाही, नेत्याची इच्छा म्हणजे कार्यकर्त्यांसाठी आज्ञा असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here