
राज्यातील हजारो उमेदवारांसाठी आनंदाची बातमी असून गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. महसूल विभागात तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, यंदा 1700 नव्या जागांचा समावेश करण्यात आला आहे.
या भरतीसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्याचे समजते. 2023 साली झालेल्या तलाठी परीक्षेनंतर निवड यादीत समाविष्ट झालेल्या 4142 उमेदवारांपैकी अनेकांची अजूनही नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता होती. आता मात्र या यादीतील अनेकांना लवकरच संधी मिळणार असल्याचे संकेत महसूल विभागाने दिले आहेत.
शासनाच्या निर्णयानुसार, जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल तयार करण्यात येत आहे आणि त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. एका उमेदवाराला फक्त एका जिल्ह्यासाठीच अर्ज करता येणार असून TCS कंपनीमार्फत परीक्षा घेतली जाणार. अर्ज प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे, अंतिम तारीख व परीक्षा दिनांकासाठी अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवा.
सध्या अनेक तलाठ्यांकडे 3-4 गावांची जबाबदारी आहे. त्यामुळे 7/12 नोंद, दाखले, पंचनामे, रेती चोरी रोखणे, महसूल वसुली यासाठी तलाठ्यांची संख्या वाढवणे गरजेचे झाले आहे. ही भरती केवळ रोजगारासाठी नव्हे, तर ग्रामविकासासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. ही भरती प्रक्रिया अनेकांना सरकारी नोकरीची संधी देणारी ठरणार आहे.




