Sangram Jagtap : ‘वारसा’ दिवाळी अंकाची समृद्ध परंपरा : संग्राम जगताप

    120

    Sangram Jagtap : नगर : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नगर जिल्ह्याला मोठी साहित्य परंपरा लाभली आहे. यातून अनेक प्रतिभावान साहित्यिक देशाला मिळाले आहे. हा प्रगल्भ वारसा खऱ्या अर्थाने जोपासण्याचे काम महाराष्ट्र साहित्य परिषदेची (Maharashtra Sahitya Parishad) सावेडी उपनगर शाखा करीत आहे. यामुळे जिल्ह्याला वैचारिक (Ideological) समृद्धी लाभली असून साहित्यिकांनाही आपले विचार ‘वारसा’ दिवाळी अंकातून व्यक्त करता आले, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.

    महाराष्ट्र साहित्य परिषद सावेडी उपनगर व शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनतर्फे प्रकाशित झालेल्या वारसा दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद, सावेडी शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया हाेते. यावेळी प्रा. डॉ. अनिल सहस्रबुद्धे, प्रा. मेधा काळे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांची उपस्थिती होती. आमदार जगताप म्हणाले, ”कोणत्याही शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीमधे साहित्यिकांचे मोठे योगदान असते. आपल्या साहित्य कृतीतून ते विधायक विचार देत असतात. यातून शहराची संस्कृती जपली जाऊन समाजाला दिशा मिळत असते. शहराची वाचन संस्कृती जोपासण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या माध्यमातुन शहराला शोभेल, असे राष्ट्रीय दर्जाचे आधुनिक वाचनालय निर्माण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होईल.”

    प्रा. डॉ. अनिल सहस्रबुद्धे म्हणाले, ”जिल्ह्याला लिखित साहित्य निर्माण करण्याची मोठी परंपरा संत ज्ञानेश्वर, चक्रधर स्वामी, अगस्ती ऋषींनी सूरु केली. तोच वारसा पुढे नेण्याचे अनमोल कार्य महाराष्ट्र साहित्य परिषद सावेडी शाखा करीत आहे. अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, प्रमूख कार्यवाह जयंत येलूलकर यांच्या सक्रिय सहभागामुळे साहित्य चळवळीला चैतन्य प्राप्त होऊन ही चळवळ जिवंत वाटते. वारसा दिवाळी अंकाला गेल्या पाच वर्षांपासून प्रतिष्ठेचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळत आहे. हा आपल्या जिल्ह्याचा गौरव आहे.”


    अंकाचे संपादक नरेंद्र फिरोदिया म्हणाले, ”वारसा दिवाळी अंकास राज्यातील लेखकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. अल्पावधीत अंक वाचकप्रिय ठरला आहे. जिल्ह्यातील साहित्यिकांना याद्वारे संधी मिळते आहे. ही आनंदाची बाब आहे. भविष्यात विविध साहित्य उपक्रमांबरोबरच सावेडी उपनगर शाखा व शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनतर्फे लवकरच जिल्ह्यातील साहित्यिकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.” प्रास्तविक करताना अंकाचे कार्यकारी संपादक जयंत येलूलकर म्हणाले, ”वारसा दिवाळी अंकाने दर्जेदार साहित्य निर्मिती करताना राज्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नरेंद्र फिरोदिया यांच्या मार्गदर्शनामुळे ही कौतुकास्पद कामगिरी करणे शक्य झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे वारसा दिवाळी अंकांची विशेष दखल घेते. हा नगर जिल्ह्याचा गौरव आहे.” कार्यक्रमास सारस्वतांची मोठी उपस्थिती होती.

    वक्त्यांनी आपल्या भाषणांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला वैचारिक मेजवानी देताना हा प्रकाशन सोहळा संस्मरणीय केला. यावेळी उपसंपादक सर्वश्री प्रा. शशिकांत शिंदे, अरविंद ब्राह्मने, अंकाची उत्कृष्ट मांडणी करणारे किरण गवते व सुबक छपाई करणारे गणेश दळवी यांचा सत्कार करण्यात आला. सुरेश चव्हाण यांनी स्वागत केले, तर नंदकुमार आढाव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्नेहल उपाध्ये, शारदा होशींग, सतीश डेरेकर, प्रा. नवनाथ वाव्हळ, अशोक जोशी, गौरव भंडारी, कार्तिक नायर, दशरथ खोसे, गणेश भगत, कमलेश जोशी, अमोल नारायणे यांनी परिश्रम घेतले. बन्सी महाराज मिठाईवाले अशाेक जाेशी यांच्यातर्फे फराळाचे वाटप करण्यात आले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here