
नगर : विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत काल (रविवारी) झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर (IND vs SA) २४३ धावांनी विजय मिळविला. भारतीय गोलंदाजीची धार पुन्हा एकदा सिद्ध झाली. विराट कोहलीने (Virat Kohli) वाढदिवसाच्या दिवशी नाबाद शतकी खेळी करत सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) एकदिवसीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली.
कोलकाता येथील इडन गार्डनच्या मैदानावर भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माने २४ चेंडूंत ४० धावा, विराट कोहलीच्या नाबाद १०१ धावा व श्रेयस अय्यरच्या ७७ धावांच्या जोरावर भारतीय संघाने ५० षटकांत पाच गडी गमावत ३२६ धावा केल्या. एडन मार्करम वगळता दक्षिण आफ्रिकेच्या सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
भारतीय गोलंदाजीच्या भेदक माऱ्याने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची फळी उध्वस्त झाला. बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ २७.१ षटकांत ८३ जमवू शकला. ही विश्वचषकाच्या इतिहासातील दक्षिण आफ्रिकेची सर्वात कमी धावसंख्या ठरली. रवींद्र जाडेजाने सर्वाधिक पाच फलंदाज बाद केले. विराट कोहली सामनावीर ठरला.
हे दोन्ही संघ यापूर्वीच स्पर्धेच्या उपांत्यफेरीत दाखल झालेले आहेत. अंकतालिकेत भारत पहिल्या, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या, ऑस्ट्रेलिया तिसऱ्या, न्युझीलँड चौथ्या, पाकिस्तान पाचव्या, अफगाणिस्तान सहाव्या, श्रीलंका सातव्या, नेदरलँड आठव्या, बांग्लादेश नवव्या व इंग्लंड दहाव्या स्थानी आहे. या विश्वचषकात भारत उपांत्या फेरीत दाखल झाला आहे. १५ नोव्हेंबरला म्हणजे भाऊबिजेच्या दिवशी भारताचा हा सामना होईल. भारतासमवेत दोन हात करणारा संघ आगामी तीन दिवसांत निश्चित होईल. श्रीलंका, नेदरलँड, बांग्लादेश व इंग्लंड यांचे परतीचे तिकीट निश्चित झाले आहे. ऑस्ट्रेलिया संघही उपांत्यफेरीत दाखल झाला आहे. आता उपांत्यफेरीतील चौथा संघ निश्चित होण्यासाठी न्युझीलँड, पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये चुरस आहे. न्युझीलँड व पाकिस्तान यांचे प्रत्येकी एक सामना खेळायचा राहिला आहे. तर अफगाणिस्तानला दोन सामने खेळायचे आहे. मात्र, अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलिया अथवा दक्षिण अफ्रिकेसारख्या बलाढ्य संघांशी सामने खेळायचे आहेत.




