
नगर : महावितरण (Mahavitaran) कडून छतावरील साैर ऊर्जा (Solar energy) निर्मिती प्रकल्पांना वेग आला आहे. राज्यात वीज ग्राहकांनी छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने (Central Govt) दिलेले १०० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट महावितरणने चार महिन्याआधीच पूर्ण केले आहे. या यशाबद्दल महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांचे आणि महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. उद्दिष्ट पूर्ण झाले असले, तरीही महावितरण ही मोहीम यापुढेही चालू ठेवणार आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर ऊर्जानिर्मितीवर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती अर्थात रूफ टॉप सोलरमुळे ग्राहक स्वतःच वीजनिर्मिती करून वापरतात. त्यामुळे त्यांचे वीजबिल कमी होते. गरजेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाली, तर त्यांना ती महावितरणला विकता येते. छतावरील सौर ऊर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकांना ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते.
महावितरणने छतावरील सौर ऊर्जा निर्मिती संच बसवून देण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा केली व संबंधित यंत्रणांशी चांगला समन्वय साधला. त्यामुळे चार महिने आधी उद्दीष्टपूर्ती करता आली. रूफ टॉप सोलरविषयी उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.राज्यात २५ सप्टेंबर रोजी रूफ टॉप सोलर वापरणाऱ्या ग्राहकांची एकूण संख्या १,०६,०९० झाली आहे व एकूण वीजनिर्मिती क्षमता १,६७५ मेगावॅट इतकी झाली आहे. राज्यात २०१६ – १७ या आर्थिक वर्षात केवळ १,०७४ ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले होते व त्यांची एकूण क्षमता २० मेगावॅट होती. त्यानंतर महावितरणकडून विविध योजनांच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यात रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत गेली. सर्वसाधारणपणे एखाद्या कुटुंबाला ३ किलोवॅटचा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प पुरेसा ठरतो. त्यासाठी सरकारकडून सुमारे ४३ हजार रुपये ते ५६ हजार रुपये अनुदान मिळते. तीन किलोवॅट ते दहा किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पांना तीन किलोवॅटनंतर प्रत्येक किलोवॅटला सुमारे सात ते नऊ हजार रुपये अनुदान मिळते.