
नगर : दहा ते बारा वर्षांपासून सातत्याने संघर्ष करुन पेन्शन (Pension) वाढ होत नसल्याने पेन्शनर चांगलेच आक्रमक झाले आहे. ईपीएस ९५ पेन्शनधारकांनी डिसेंबर अखेर पेन्शन वाढ न झाल्यास येत्या लोकसभा निवडणुकीत (LokSabha Elections) भाजप (BJP) विरोधात मतदान करण्याचा ठराव घेतला आहे.
दातरंगे मळा, मार्कंडेय संकुल येथे नुकतेच जिल्ह्यातील ईपीएस ९५ पेन्शनर्सच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष एस. एल. दहिफळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याप्रसंगी राष्ट्रीय समन्वय समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव डोंगरे, उपाध्यक्ष पुंडलिक पांडे , सरचिटणीस सुभाष कुलकर्णी, ॲड. सुधीर टोकेकर, ॲड. गोकुळ बिडवे, गोपीनाथ घायतोंडे आदी उपस्थित हाेते. सर्व पेन्शनर्सनी या मेळाव्यात एकजुटीचा नारा देऊन हक्काची पेन्शन वाढ मिळण्यासाठी जोरदार घोषणा दिल्या.
या मेळाव्यात सरकारला जाग आणण्यासाठी डिसेंबरमध्ये दिल्ली येथे जंतरमंतरवर देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर २०२३ पर्यंत पेन्शन वाढ न झाल्यास भाजप विरोधात मतदान करण्याचा ठराव एस. एल. दहिफळे यांनी मांडला. त्याला सर्वांच्या वतीने ॲड. सुधीर टोकेकर यांनी अनुमोदन दिले. जो पक्ष आपल्या अजेंड्यात व जाहीरनाम्यात पेन्शन वाढचा मुद्दा घेईल, त्यांना पेन्शनर्सचे मतदान राहणार असल्याचे स्पष्ट करुन किमान नऊ हजार रुपये पेन्शन वाढ करण्याची मागणी करण्यात आली.



