
21 फेब्रुवारीपासून राज्यातील बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. बारावी परीक्षेचा पहिलाच पेपर इंग्रजी विषयाचा होता. मात्र पहिल्याच पेपरला बोर्डाचा गलथान कारभार उघडकीस आला. कारण बारावी बोर्डाच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नाऐवजी चक्क उत्तरच देण्यात आले होते. तर इतर दोन प्रश्नांमध्ये प्रश्नाऐवजी तपासणाऱ्याला सूचना दिल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचे नेमके काय उत्तर लिहावे? असा प्रश्न उपस्थित राहिला होता.
अशातच आता बोर्डाने विद्यार्थ्यांच्या बाजूने विचार करत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रश्नांसंदर्भात बोर्डाला आपली चूक लक्षात आली असून सर्वच विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांचे सरसकट सहा गुण देण्याची भूमिका पुणे बोर्डाने घेतली आहे. इंग्रजीचे विषयतज्ज्ञ व सर्व विभागीय मंडळाचे प्रमुख नियामक यांच्यासमवेत संयुक्त सभा घेणार आहे. सभेनंतर विद्यार्थ्यांना सरसकट गुण देण्याचा अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.
या सर्व प्रकारामुळे यंदा इंग्रजी विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का निश्चितपणे कमी होईल असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.





