नवी दिल्ली: रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध सुरु झालंय त्याला सात दिवस होत आले आहेत. भारत सरकारनं आता खारकीव मधील भारतीयांसाठी दुसऱ्यांदा मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. खारकीवमध्ये राहणाऱ्या भारतीयांना तातडीनं ते शहर सोडावं, असं सांगण्यात आलं आहे. खारकीवमधील धोकादायक स्थिती लक्षात घेता नागरिकांनी रेल्वे, बसेस द्वारे शहर सोडावं, कोणतेही वाहन उपल्बध न झाल्यास भारतीयांनी पायी चालत शहर सोडावं, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलं आहे.
यूक्रेनधील भारतीय दुतावासानं खारकीव मध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आज दुसरी अॅडव्हायजरी जारी केली आहे. खारकीव मधील भारतीय नागरिकांनी सुरक्षेसाठी तातडींन शहर सोडावं. खारकीवमधील स्थिती खराब होत असल्यानं भारतीयांनी पेसोच्यान,बाबाई, बेजल्युदिवाका, या शहरांमध्ये आश्रय घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
खारकीव मधील भारतीयांना रेल्वे , बसेस आणि मिळेल त्या वाहनाने शहर सोडण्यास सांगण्यात आलं आहे. एखाद्या व्यक्तीला वाहन उपलब्ध न झाल्यास त्यानं पायी शहर सोडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी भारतीय दुतावासानं खारकीवमधील भारतीयांना तातडीनं शहर सोडण्याचे आदेश दिले होते. रशियानं खारकीववर हल्ला करण्यापूर्वी भारताला कळवलं होतं. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
रशियानं यूक्रेनवर आक्रमण केलंय त्याला आता 7 दिवस पूर्ण होत आलेले आहेत. कीव हे राजधानीचं शहर अद्याप रशियाच्या पूर्णपणे ताब्यात आलेलं नाही. कीव अद्यापही ताब्यात येत नसल्यानं रशिया अस्वस्थ आहे. रशिया आज कीव शहरावर मोठ्या प्रमाणात हल्ला करु शकतं. याशिवाय खारकीव शहरावरही रशियाला कब्जा मिळवायचा असल्यानं खारकीवमध्ये मोठे हल्ले रशियन फौजांकडून केला जाण्याची शक्यता आहे.