मुंबई – भाजप आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा युती होणार असून राज्यात युतीची सरकार स्थापना होणार असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून दबक्या आवाजात होत आहे. त्यामूळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. याच सर्व चर्चांवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाष्य केले.
मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले की युतीची कसलीही चर्चा नाही. कुणाशीही चर्चा नाही. दबके आवाज वैगैरे असं काही नसतं. आमच्याकडून कोणी परस्पर काही बोलत असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. तो मूर्खपणा आहे. शिवसेना-भाजपा युतीत आम्ही थोडंफार नाही तर २५ वर्ष एकत्र होतो, नांदलो ते नातं भाजपच्या आडमुठेपणामुळे संपलं आहे. वैफल्यग्रस्त, निराश मनाने राजकारण करणारे असतात, त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशा असते, असं राऊत म्हणाले.
तर स्थानिक पातळीवर स्थानिक राजकारण्याच्या नावाखाली काही भ्रष्ट हातमिळवणी होत असतात. आमची भाजपासोबत युती असतानाही आमच्या काही लोकांनी केल्या होत्या. आता अशी मनमानी चालणार नाही. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. आम्ही दक्षता घेत असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनेही घ्यावी. जास्तीत जास्त आपले नगराध्यक्ष निवडून यावेत यासाठी सर्वांनी काम करावं,असं आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केला.












