Kangana Ranaut Statement : कंगनानंतर आता ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेही वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रनौतनं केलेल्या स्वातंत्र्याबद्दलच्या वक्तव्याचं गोखलेंनी समर्थन केलंय. 1947 साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती असं कंगना म्हणाली होती. त्यानंतर देशात मोठा वाद निर्माण झाला होता. कंगनाच्या त्याच वक्तव्याचं विक्रम गोखले यांनी समर्थन केलंय. ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीनं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोखलेंनी हे विधान केलंय. यावेळी मोदींचं कौतुक केलं. तर शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यास बरं होईल असंही त्यांनी म्हटलंय.
स्वातंत्र्यासंबंधी कंगना रनौतने केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झालेला असताना आता पुन्हा या वादात भर पडलीय, कंगनाच्या या वक्तव्याचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले आहे. विक्रम गोखले यावेळी म्हणाले की, कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचे , कोणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, ते भिकेनेच मिळाले आहे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना कोणी वाचवलं नाही अनेकजण बघत राहिले असा गंभीर आरोप विक्रम गोखले यांनी यावेळी केला.






