कोल्हापूर, दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचे खासगी शिकवणी वर्ग / कोचिंग क्लासेस अटी व शर्तीस अधीन राहून सुरु करण्यास जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी परवानगी दिली.
१) ही परवानगी फक्त इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या खासगी शिकवणी वर्गाकरीता राहील. वर्गामध्ये एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविण्यात यावा, किंवा दोन खुर्च्या मधील एक खुर्ची विनावापर ठेवावी. तसेच प्रत्येक वर्गखोली हवेशीर व 50 टक्के पेक्षा कमी आसन क्षमतेने वापरावी.
२) खासगी शिकवणी वर्ग / कोचिंग क्लासेसच्या सर्व प्रशिक्षक व व्यवस्थापन कर्मचारी यांचे लसीकरण (दोन्ही डोस) झालेले असणे बंधनकारक असेल.
३) खासगी शिकवणी वर्ग / कोचिंग क्लासेसच्या प्रवेश द्वारावर उपस्थित प्रत्येक विद्यार्थी / विद्यार्थिनींचे अनिवार्यतेने थर्मल स्क्रिनिंग करण्यात यावे.
४) खासगी शिकवणी वर्ग / कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तीन पदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क किंवा रुमाल अथवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक राहील.
५) या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यामध्ये आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य ते शारीरिक अंतर राखण्याबाबतचा नियम काटेकोरपणे पाळण्यात यावा. ताप, सर्दी, खोकला इ. कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना खासगी शिकवणी वर्ग / कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देऊ नये.
६) शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2020/प्र.क्र.140/एसडी-6, दिनांक 10/11/2020 रोजीच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील.
७) एकमेकांच्या वस्तु उदा. पेन, मोबाईल व इतर शैक्षणिक साहित्य एकमेकांनी हाताळू नयेत.
८) खासगी शिकवणी वर्ग / कोचिंग क्लासेसच्या ठिकाणाचे प्रवेशद्वार, बैठक कक्ष, बाथरुम, प्रसाधनगृह येथे हात धुण्याकरिता पुरेशा प्रमाणात साबण व सॅनिटायझर्स उपलब्ध करुन ठेवण्यात यावेत.
शिकवणी वर्गामधील सर्व खोल्यांचे 1 टक्का सोडीयम हायपोक्लोराईड वापरुन दररोज निर्जंतुकीकरण करण्यात यावे. तसेच प्रत्येक शिकवणी तासिकेनंतर वर्ग खोली व आसन व्यवस्था निर्जंतुक करण्यात यावी.
आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ अथवा उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती अथवा आस्थापनांविरुध्द भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे दंडात्मक / फौजदारी / परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई करण्याचे अधिकार त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना देणेत येत आहेत.
00000000





